सर्वांगीण आरोग्य सेवेला चालना – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
औरंगाबाद

सर्वांगीण आरोग्य सेवेला चालना – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

फेब्रुवारी 10, 2026

छत्रपती संभाजीनगर, 10 : सीजीएचएस अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या आयुष वेलनेस सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना आयुर्वेद व पारंपरिक उपचार पद्धतींचा लाभ मिळणार असून, हे केंद्र सर्वांगीण आरोग्य सेवेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे प्रतिपादन आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी केले.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत आयुष व सीजीएचएस वेलनेस सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बाबुराव कोहळीकर, केंद्रीय वस्तू व सेवा कर तथा केंद्रीय उत्पादन शुल्क, कार्यालयाचे आयुक्त प्रदिप गुरुमुर्ती, आरोग्य विभागाचे सहायक संचालक दयानंद मोतीपवळे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, शिक्षण विभागाचे उपायुक्त डॉ. अंकुश पांढरे, डॉ. सी. पी. चौधरी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले, सन 2023 मध्ये तत्कालीन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते सीजीएचएस केंद्राचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर येथे एलोपॅथीसह आधुनिक उपचार सुविधा सुरू करण्यात आल्या. ही शहराच्या आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वाची सुरुवात ठरली. नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा आणि आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन सन 2024 मध्ये सीजीएचएस अंतर्गत आयुष विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाची आज प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

“आयुर्वेद ही केवळ उपचार पद्धती नसून ती एक संपूर्ण जीवनशैली आहे,” असे सांगून त्यांनी योग, युनानी, सिद्ध व होमिओपथी या पारंपरिक उपचार पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, तणाव, निद्रानाश यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असून, आयुष पद्धतीद्वारे त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते, असेही त्यांनी नमूद केले. या वेलनेस सेंटरमुळे नागरिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, दीर्घकालीन आरोग्य सुधारेल आणि उपचार खर्चातही बचत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

केंद्र सरकार आजारांवरील उपचारांबरोबरच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला प्राधान्य देत असून, “उपचारापेक्षा प्रतिबंध” या तत्त्वावर काम करत आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग व ध्यान यांचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरात जनजागृती मोहिमा, आरोग्य शिबिरे व प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात असून, पारंपरिक उपचार पद्धतींचा वैज्ञानिक व सुरक्षित वापर वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांनी सांगितले.

देशात आयुष क्षेत्रात प्रशिक्षित डॉक्टरांची संख्या वाढत असून, नव्या पिढीचा मोठ्या प्रमाणावर सहभाग या क्षेत्रात वाढत आहे. महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागात आयुष व सीजीएचएस केंद्रांचा विस्तार करण्यात येणार असून, आरोग्य सुविधा अधिक सक्षम केल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक व शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून, येथे या केंद्राची सुरुवात होणे अभिमानास्पद आहे.   केंद्र सरकारच्या या धोरणानुसार आरोग्य क्षेत्रात व्यापक सुधारणा करण्यात येत असून, सीजीएचएस अंतर्गत लाभार्थ्यांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार उपचार मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या योजनांमुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी, निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचा आर्थिक भार कमी झाला असून, खासगी रुग्णालयांवरील अवलंबित्व घटले आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य विभागाचे सहायक संचालक दयानंद मोतीपवळे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी विविध विभागांचे अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा